Maharashtra Rain Alert Today महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर! मुंबई, रायगड, कोकण, विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता. पिकांचे नुकसान, मच्छीमारांना इशारा. पुढील ३ दिवस वादळी वारा आणि सरींची शक्यता
Mumbai rain update | राज्यात पावसाचा पुन्हा मुक्काम झाला असून, दिवाळीनंतरही आकाश ढगाळ राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मागील काही दिवसांपासून कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडत आहे. या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. कापणीस आलेला भात, सोयाबीन, मका, टोमॅटो, कांदा आणि भाजीपाला पाण्याखाली गेला आहे. अनेक ठिकाणी शेतं चिखलमय झाली असून, शेतकरी हतबल झाले आहेत.
Maharashtra Rain Alert Today राज्यात पुन्हा पावसाची हजेरी
IMD weather forecast Maharashtra भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाची क्षेत्रं सक्रिय झाली आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात पुढील दोन ते तीन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत राज्यात अधूनमधून पाऊस सुरू राहणार असून, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातच हवामान कोरडे होण्याची शक्यता आहे.
अरबी समुद्रातील हालचालींमुळे वाढला धोका
शनिवारी अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र नैर्ऋत्येकडे सरकले असून, पुढील २४ तासांत ते पूर्व-मध्य भाग ओलांडेल, असा अंदाज आहे. हे कमी दाब क्षेत्र महाराष्ट्राच्या किनारपट्टीजवळून प्रवास करणार असल्याने कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण अधिक असेल. त्यामुळे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि नाशिक परिसरात मुसळधार सरी कोसळण्याचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबई, ठाणे, नवी मुंबईत रिपरिप
Monsoon in Maharashtra मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईत शनिवारी आणि रविवारी दिवसभर रिमझिम पाऊस सुरू होता. सायंकाळी पावसाचा जोर काहीसा वाढला. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात रविवारी सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत १४.६ मिमी, तर सांताक्रूझ केंद्रात ६.६ मिमी पावसाची नोंद झाली. त्याचबरोबर ठाणे आणि नवी मुंबईतही हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.
मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा
हवामान विभाग आणि भारतीय तटरक्षक दलाने राज्यातील सर्व मच्छीमारांना पुढील काही दिवस समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे. कारण, पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून, २९ ऑक्टोबरपर्यंत वाऱ्याचा वेग ३५ ते ४५ किमी प्रतितास, तर काही ठिकाणी ५५ किमी प्रतितासपर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे समुद्र खवळलेला राहणार आहे.
तापमानात घट – नागरिकांना दिलासा
राज्यात सर्वत्र पावसामुळे तापमानात घट झाली आहे. काही दिवसांपूर्वी ज्या भागात तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या वर नोंदले जात होते, तेथे आता २९ ते ३१ अंश सेल्सिअस इतके तापमान राहिले आहे. अकोला येथे रविवारी २९.२°C, बुलढाणा २९.२°C, गोंदिया २९.६°C, आणि यवतमाळ येथे ३०°C तापमान नोंदले गेले. या घसरणीमुळे नागरिकांना उकाड्यातून दिलासा मिळाला असला तरी, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर काळजीचे ढग कायम आहेत.
रायगड जिल्ह्यात ‘यलो अलर्ट’
Raigad yellow alert | हवामान खात्याने रायगडसह संपूर्ण कोकणात ३० ऑक्टोबरपर्यंत ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. या सततच्या पावसामुळे रायगड जिल्ह्यातील भातकापणी ठप्प पडली असून, शेतकरी कापणीचे काम थांबवून हवामान स्थिर होण्याची वाट पाहत आहेत. अनेक ठिकाणी पिके पाण्याखाली गेली असून, मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
हेही वाचा
पर्यटनावरही परिणाम – गेटवे ते मांडवा सेवा बंद
Maharashtra Rainfall | दिवाळीच्या सुट्टीत रायगडातील अलिबाग, काशिद, मुरुड, हरिहरेश्वर या किनाऱ्यांवर मोठी गर्दी झाली होती. पण हवामानाच्या बदलत्या परिस्थितीमुळे पर्यटकांचा हिरमोड झाला आहे. समुद्रात खवळ निर्माण झाल्याने तीन नंबरचा बावटा लावण्यात आला आहे, त्यामुळे गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा जलवाहतूक सेवा शनिवारी संध्याकाळपासून बंद करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांची चिंता वाढली
Farmer Crop Loss | अनेक ठिकाणी शेतकरी पिकांचे नुकसान पाहून हवालदिल झाले आहेत. “कापणीवर आलेली पिकं पावसाने झोडपली. आधीच दर कमी, आता नुकसान झाल्याने खर्च वसूल होणार नाही,” असा सूर राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये दिसत आहे. हवामान विभागानुसार, पुढील काही दिवसांत अजून दोन कमी दाबाची क्षेत्रं तयार होण्याची शक्यता आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी सावध राहावे, असा सल्ला देण्यात आला आहे.
हेही वाचा